स्वच्छतादूत : पद्मश्री एस. दामोदरन - Welcome to Swayam Talks
×

स्वच्छतादूत : पद्मश्री एस. दामोदरन

सर्वेश फडणवीस

दक्षिण भारतातील ६०० हून अधिक गावे आणि २०० पेक्षा अधिक झोपडपट्ट्यांमधील नागरिकांना उघड्यावर शौच करण्यापासून परावृत्त करणारे एस. दामोदरन केंद्र सरकारच्या पद्मश्री पुरस्काराचे मानकरी ठरले. त्यांच्या कार्याचा थोडक्यात आढावा.
 

Published : 5 April, 2024

स्वच्छतादूत : पद्मश्री एस. दामोदरन

Get Better Each Week #41

सामान्य घटनांमध्येच आयुष्याला असामान्य वळण देण्याची ताकद असते. अनेकदा सामान्य वाटणार्‍या या घटना आयुष्याला लक्ष्य देतात आणि त्यातूनच चाकोरीबद्ध आयुष्याला वेगळी कलाटणी मिळते. साधारणपणे ३२ वर्षांपूर्वी एस. दामोदरन यांनी एक घटना बघितली, ज्याने त्यांना हादरवून सोडले. या घटनेतून त्यांनी ध्यास घेतला आणि दक्षिण भारतातील ६०० हुन अधिक गावे आणि २०० पेक्षा अधिक झोपडपट्टीमधील नागरिकांना उघड्यावर शौच करण्यापासून परावृत्त केले. केंद्र सरकारने या अद्वितीय कार्यासाठी पद्मश्री पुरस्काराने त्यांचा गौरव केला आहे. या वेळी आपण एस. दामोदरन यांच्याविषयी जाणून घेणार आहोत.

१५ ऑगस्ट २०१४ साली स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून घोषणा केली की," महात्मा गांधी यांच्या दीडशेव्या जयंतीपर्यंत अर्थात २०१९ पर्यंत देश शौचालयमुक्त झालेला असेल" त्यांची ही घोषणा कोणत्याही नागरिकाला आनंद देणारी आणि जगात देशाची मान उंचावणारी होती. जो देश महासत्ता होण्याची स्वप्ने पाहतो, ज्याची अर्थव्यवस्था पहिल्या पाच-सहा बड्या देशांमध्ये गणली जाते आणि ज्याला स्वातंत्र्य मिळून सात दशके उलटली आहेत, अशा हजारो वर्षांचा इतिहास असणार्‍या देशात नागरिक पहाटे उठून उघड्यावर शौचास बसतात, ही लांच्छनास्पद गोष्ट होती आणि पंतप्रधानांनी भाषणात या गोष्टींचा जाहीर उल्लेख केला. त्यावेळी अनेकांनी या घटनेची खिल्ली उडवली, पण सत्य मांडण्याची ताकद जगाने अनुभवली आणि त्यातूनच एस.दामोदरन यांच्यासारख्या कार्य करणार्‍या दूरस्थ नागरिकाला प्रेरणा मिळाली आणि कार्य अधिक जोमाने सुरू झाले.

तमिळनाडूमधील त्रिची येथे दोन मुले उघड्यावर शौचास बसली होती. अचानक भरधाव वेगाने आलेल्या बसने त्या मुलांना धडक दिली आणि ती दोन मुले जागीच ठार झाली. ही बातमी व्यथित करणारी होती आणि या दुर्घटनेचे प्रमुख कारण म्हणजे त्या गावी स्वच्छतागृहांचा अभाव होता. एस. दामोदरन यांना समजताच त्यांना स्वस्थ बसवत नव्हते आणि या घटनेमुळे त्यांनी आपल्या जीवनाचे ध्येय निश्चित केले, प्रयत्नांची पराकाष्ठा केली आणि कार्याला सुरुवात झाली.

६३ वर्षीय साई दामोदरन यांनी १९८७ मध्ये ग्रामालयाची स्थापना केली आणि तेव्हापासून ते पाणीपुरवठा, स्वच्छता, सुविधा, शौचालय, स्त्रियांच्या मासिक पाळीची स्वच्छता आणि पोषण याबाबत जनजागृती करत आहेत. साधारण तीन सदस्यांपासून सुरू झालेल्या ग्रामालयांची संख्या आता १०० हुन अधिक आहे. पदवी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी सुरुवातीला ग्रामीण भागात सुधारणा करण्याचा एक मार्ग म्हणून ग्रामालय सुरू करण्याचा विचार केला. तथापि, त्यांनी गावोगावी सर्वेक्षण केले असता त्यांच्या लक्षात आले की, गावांतील सर्वात मोठी समस्या म्हणजे पिण्याचे पाणी आणि उघड्यावर शौचास जाण्याने होणारे आजार हे त्याचे प्रमुख कारण आहे. 

ग्रामालयाने त्रिचीमधील थांडवमपट्टी हे पहिले उघड्यावर शौचमुक्त गाव म्हणून विकसित केले. दक्षिण भारतातील सर्व राज्यांमधील गावे उघड्यावर शौचमुक्त करण्यासाठी त्यांचे काम सुरू आहे. आतापर्यंत ग्रामालयाच्या माध्यमातून अनेक गावांमध्ये आणि शाळांमध्ये सहा लाखांहून अधिक शौचालये त्यांनी बांधली आहेत. यासोबत गावातील नागरिकांना  पिण्याच्या पाण्याची काळजी तसेच दोन लाखांहून अधिक शाळकरी मुलींना मासिक पाळीतील स्वच्छता शिकवली आहे. यामुळे वातावरणाचे, जमिनीचे आणि जलस्रोतांचे प्रदूषण टाळणे शक्य झाले आहे. घरोघरी शौचालय बांधण्याविषयी जनजागृती करून आणि स्वच्छता शिक्षणाद्वारे हा विषय आता अधिक व्यापक स्तरावर गेला आहे. ग्रामालय संस्थेने २०२१ साली त्रिची येथे ‘हार्पिक वर्ल्ड टॉयलेट कॉलेज’ ची स्थापना केली आहे, स्वच्छता कर्मचार्‍यांनी त्यांचे जीवन कसे सुधारायचे आणि कचरा सुरक्षितपणे कसा हाताळायचा हे शिक्षण याठिकाणी दिले जाते.

साई दामोदरन यांनी दक्षिण भारतात अनेक मॉडेल प्रकल्प तयार केले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सीआरएसपी, टीएससी, एनबीए, एलसीएस (लो कॉस्ट सॅनिटेशन कम स्कॅव्हेंजर्स रिहॅबिलिटेशन प्रोग्राम) आणि एसबीएम ग्रामीण यांसारख्या विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून सहा लाखांहून अधिक कायमस्वरूपी घरगुती शौचालये बांधण्यात आली, जी आजही सुस्थितीत आहे आणि चांगली वापरली जातात.

Link copied to clipboard

भन्नाट माणसांच्या अद्भुत विश्वात एकदा डोकावून तर पहा !

महाराष्ट्राच्या मातीतील चार अफलातून गोष्टी सांगणारी मराठीमधील सर्वात भव्य Web Series ‘अभिमानास्पद महाराष्ट्र

More blogs


 

काळजी वाहणारे Robot युग!

Robots बद्दल गेले अनेक वर्ष आपल्याला कुतूहल आहे. मानवी गरजा समजून त्यावर supercomputing च्या साहाय्याने emotional support देणारा robot बनवता आला...

चेकलिस्ट: मतदान करण्यापूर्वीची!

निवडणुकांत मतदान करण्यापूर्वी आपण कधी चेकलिस्ट बनवली आहे का? मतदार राजा सजग झाला तर राजकारण अधिक गंभीर होऊ शकते. आता...

चांगुलपणाची प्रतिमा : मिसेस हॅरिस

कधी उगाच उदास वाटतं, माणुसकी, चांगुलपणा यावरचा विश्वास कमी व्हायला लागतो, उगीच चिडचिड होत असते, राग राग करून काही होणार...